Lockdown : राज्यातील लॉकडाउन काही दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले ‘संकेत’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असे संकेत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे.देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही या आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे. देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वाजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठी काम आहे. त्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केलं.