उध्दव ठाकरे यांच्या खुर्चीवर ‘कोरोना’च्या ग्रहणाचं ‘सावट’, मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी ‘हे’ 2 पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा कहर वेगाने वाढत असून महाराष्ट्रात या संक्रमणाची प्रकरणे जास्तच वाढत आहेत. अशात महाराष्ट्रात एका बाजूला लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर संकट आले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत म्हणजेच विधानसभेचे (एमएलए) किंवा विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य नाहीत. आता कोरोनाच्या धोक्यामुळे महाराष्ट्रातील एमएलसीची निवडणूक पुढे ढकलली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद वाचवणे कठीण झाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. घटनेच्या अनुच्छेद १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना ६ महिन्यांत राज्यातील कोणत्याही सभागृहाचे सभासद होणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची राखण्यासाठी २८ मेपूर्वी विधिमंमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे.

उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या एखाद्या आमदाराला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. यानंतर निवडणूक आयोगाला २९ मेपूर्वी ४५ दिवसांपूर्वी पोटनिवडणूकीची घोषणा करावी लागेल. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येची आकडेवारी असलेल्या महाराष्ट्रात त्यांना आपल्या कोणत्याही आमदाराचा राजीनामा देणे आवडणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळवणे. यासाठी निवडणूक आयोगाला अवघ्या १५ दिवस आधी अधिसूचना जारी करावी लागेल.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ २४ एप्रिल रोजी संपत आहे. या ९ विधान परिषद जागांवर निवडणुक होणार होती, ज्याला कोरोनाच्या संकटामुळे पूढे ढकलले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेच्या ९ जागांपैकी कोणत्याही जागेवर निवडणूक लढवू शकतात, परंतु कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक आयोगाने ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. यामुळे आता त्यांच्या मार्गात अडचण निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहण्याचे दोन पर्याय बाकी आहेत. पहिला पर्याय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अवलंबून असेल. महाराष्ट्रात राज्यपालांनी नेमलेल्या विधानपरिषदेच्या दोन जागा सध्या रिक्त आहेत. यापैकी एका जागेवर राज्य सरकार उद्धव ठाकरे यांचे नाव उमेदवारीसाठी राज्यपालांना सुचवू शकते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने पाठवलेल्या नावाला सहमती दर्शवल्यास उद्धव ठाकरे आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यात यशस्वी होऊ शकतात.

मुख्यमंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी उद्धव यांच्याकडे दुसरा उपाय असून त्यांनी आधीच्या शपथविधीपासून सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घ्यावी लागेल, यामुळे त्यांना विधिमंडळात जाण्यासाठी ६ महिन्यांचा आणखी अवधी मिळेल.