पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी रस्त्यावर उतरुन घंटानाद केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. घरात बसून सर्वकाही करता आले असते, त्यासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता नव्हती. अशा शब्दात त्यांनी रोष व्यक्त केला.
देशभरात काल जनतेने थाळ्या, घंटा, शंख वाजवत अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांचे आभार मानले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जीव धोक्यात घालून सेवा करणार्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचार्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले होते. मात्र, अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरलेले चित्र दिसून आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणे अपेक्षित नाही असे पवार यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधात लढणार्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार!
जनतेने आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार. परंतु लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.