Lockdown : महाराष्ट्रातील 3 कोटी केशरी कार्डधारकांना रेशन दुकानातून स्वस्त दराने धान्य वाटपास सुरूवात

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाउनच्या काळात गरीब गरजू लोकांपर्यंत पुरेसे अन्न पोहचण्यासाठी राज्य शासनाने १ महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून आतापर्यंत १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर, केशरी कार्डधारकांनाही धान्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानातून या लाभार्थींना गहू आणि तांदूळ कमी दराने देण्यात येत आहे. . राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा रेशनकार्ड धारकांची संख्या १ कोटी ६० लाख आहे. त्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्याचे वितरण केले जाते. या योजनेमधून सुमारे २० लाख १२ हजार ५३३ क्विंटल गहू, १५ लाख ५४ हजार ६०४ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ९२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख २४ हजार ७९३ शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. याअंतर्गत त्यांना राहत्या ठिकाणीच अन्नधान्य पुरवण्यात येते. तर, आता राज्यातील केशरी कार्डधार नागरिकांनाही धान्य देण्यास सुरुवात झाल्याची माहिती राज्याचे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी २३ लाख १३ हजार ६३४ रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्डवरील ५ कोटी ५९ लाख ५७ हजार ४२५ लोकसंख्येला २७ लाख ९७ हजार ८७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. आता, महाराष्ट्र सरकारने मे आणि जून महिन्यासाठी ३ कोटी केशरी रेशनकार्ड धारकांना ३ किलो गहू ₹ ८ प्रतिकिलो व २ किलो तांदूळ ₹ १२ प्रतिकिलो दराने वितरित करण्यास सुरुवात केली आहे. साडेचार लाख मेट्रिक टन गहू आणि तांदूळाचे वितरण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे, केसरी कार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन या धान्यवाटप योजनेचा लाभ घ्यावा. असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

एकंदरीतच काय तर या लॉकडाऊन काळात गरीब जनतेचे पुरेश्या अन्नाअभावी खाण्याचे हाल होत आहे. हीच परिस्तिथी ओळखून सरकारने त्या दिशेने पाऊले उचलली आहे.