पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या धसक्याने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन्ही सामने रद्द करण्यात आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता विमानतळावरून दुबईमार्गे स्वदेशी परतला. या सामन्यांच्या कालावधीत म्हणजेच 18 मार्चच्या आधीच भारत भविष्यात लॉकडाउनमध्ये जाणार याची कल्पना आली होती, असे वक्तव्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी त्यादिवशी आम्ही आमच्या गाड्यांमधून रस्त्यावर आलो, तेव्हाच अंदाज आला होता की काही तरी मोठे नजीकच्या काळात भारताच्या दिशेने कूच करत आहे. ज्या प्रकारे कोरोनाचा फैलाव होत होता, त्यावरून धोका ध्यानात आला होता. त्यात भर म्हणून दुसरी वन डे रद्द झाली तेव्हा तर खात्रीच पटली की लॉकडाउन अनिवार्य आहे, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले. टीम इंडिया जेव्हा न्यूझीलंडमध्ये होते तेव्हाच खेळाडूंना करोनाच्या प्रभावाचा अंदाज आला होता. आम्ही सिंगापूर मार्गे भारतात आलो, तेव्हाच आम्हाला अंदाज आला होता. आम्ही जेव्हा भारतात परतलो तोच कोरोना स्क्रीनींगचा पहिला दिवस होता. आम्ही अगदी योग्य वेळी मायदेशात परतलो, असे शास्त्री यांनी नमूद केले. दुसरीकडे आफ्रिकेचा संघ आधी धरमशाला नंतर कोलकाता असे करत थेट दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेत परतला. भारतात आणि दुबईत या व्हायरसचा चांगलाच फटका बसला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आफ्रिकन क्रिकेटपटूंना काही दिवस सामान्य जनजीवनापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.