मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, संपुर्ण राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत देखील भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या रविवार रात्रीपासून (दि.28) राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधिक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. तर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्यासह इतर अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीला उपस्थित होते.

लॉकडाऊनची इच्छा नाही, पण….
मुख्यमंत्री म्हणाले, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना त्यांनी दिली.

धोका टळला नसून वाढला आहे
ब्रिटन सारख्या देशात दुसरी लाट आली. त्यांनी अडीच महिन्यांच्या लॉकडाउन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हीच परिस्थिती आपल्याकडे होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे राज्यातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे. राज्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत असून येत्या काळात ती आणखी वेगाने वाढेल असे सांगितले जातेय. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या ठिकाणी लॉकडाउन लावावा पण असे करत असताना अचानक लॉकडाऊन लावू नका. लोकांना सूचना देऊन याची जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी.

निर्बंध कडक करावे लागतील
राज्यातील नागरिकांनी कोविड-19 च्या निमांचे उल्लंघन केले तर येत्या कालावधीत निर्बंध अधिक कडक करावे लागलतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू मात्र डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार हे पाहिले पाहिजे. खासगी आस्थापनांसाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होते का हे पाहिले पाहिजे. तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी काटेकोर पाहणी केली जावी. नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर कडक कारवाई करण्यात यावी. मॉल्स रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील. तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर घातलेली बंधने पाळावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवा
राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आघाडीवर आहे. असे असले तरी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवा. लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषधोपचारपद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला द्यावी. राज्यात 52 लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आज लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टेस्टिंगची संख्या वाढवा आणि ‘याची’ही काळजी घ्या
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, रुग्णालयातील सोयी-सुविधा, ऑक्सिजन साठा व पुरवठा, व्हेंटिलेटर्स, आयसीयु व ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण वाढवले आहे ते आणखी वाढवा. मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होते. संपूर्ण राज्यात ही टेस्टिंगची संख्या वाढवा, पुरेशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.