Lockdown : खासगी क्षेत्रातील कामगारांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. हा वाढता प्रभाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रहितासाठी घोषित करण्यात आला. अशा परिस्थिती मध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. तसेच अनेक खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन मुळे घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासगी क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी वर्गाच्या पगारात कपात करू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. याबाबत ३१ मार्च रोजी राज्य सरकार कडून त्या संदर्भात पत्रक काढून आदेश जारी करण्यात आला. खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाच्या वेतनात कपात करू नये असं आवाहन कंपनीचे अध्यक्ष, मालकांना केलं आहे. राज्य शासनाचा हा आदेश निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्य व्यापारी वर्गासाठी लागू करण्यात आला आहे.

देशभरात कोरोना संसर्गाचे आतापर्यंत १९६४ रुग्ण सापडले आहे तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहे. त्यात पुण्यातील ३ तर बुलढाण्यात १ रुग्ण आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ३३८ वर पोहचली आहे. पुण्यात एकीकडे कोरोना रुग्ण बरे होताना दिसत असले तरी दुसरीकडे आज नवे रुग्ण आढळल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे.

कोरोनाच्या प्रभावाला रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन कडक पद्धतीने पाळला जात आहे. लॉकडाऊन च्या काळात अनेक व्यवसाय, कंपनी पूर्ण रित्या १४ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आणि कामगार वर्गाचे पगार कापले जाण्याची भीती होती. मात्र आता पगार न कापण्याचे आदेश राज्य सरकार कडून देण्यात आले आहे.