‘रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का ?’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दुसऱ्या लाटेत राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. मात्र आता राज्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. सोमवारी राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच दरम्यान मनसेने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का ? असा संतप्त सवाल मनसेने केला आहे.
आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 11, 2021
राज्यातील कोरोना स्थितीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत ट्विट केले आहे. आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याचं श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात ? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 60 हजारांवर गेला होता. मात्र, आता रुग्ण संख्येत घट होताना पहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात 37 हजार 326 रुग्ण आणि 549 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत सोमवारी 1 हजार 794 नवे रुग्ण आढळून आले तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 हजार 580 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.