मुंबईत 950 हून अधिक ‘कोरोना’ मृत्यू का दडवले ? देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर ‘आरोप’, मुख्यमंत्र्यांना लिहिलं आरोपपत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रूग्ण आणि मृतांची संख्या सतत वाढत चालली आहे. दरम्यान, सुरूवातीपासूनच कोरोनावरून राज्य सरकारला घेरणार्‍या भाजपाने पुन्हा एकदा कोरोना वरून महाविकास आघाडी सरकारच्या मुंबईतील कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यांवरून गंभीर आरोप केले आहेत. आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक करोना मृत्यू का दडवले? अक्षम्य दुर्लक्ष का होतेय? राज्य सरकार अशा लोकांवर कोणती कारवाई करणार ? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. यावरून फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक प्रकार आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकार करणार आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पत्रात पुढे म्हटले आहे की, आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठवले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

आयसीएमआरच्या गाइडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून 356 अपात्र ठरवलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे 451 मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजेत.

आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी या पत्रात केला आहे.

पत्रात पुढे लिहिले आहे की, अशीही माहिती मिळाली आहे की, सुमारे 500 अशी प्रकरणे आहेत, जी विविध रूग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार कोणती कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत.

पत्राच्या शेवटी फडणवीस यांनी म्हटले आहे की, पारदर्शकता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे 950 वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्रात केली आहे.