Coronavirus : आजच्या घडीला परीक्षा महत्त्वाची आहे का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्गाची भीती दिवसेंदिवस गडद होत आहे. त्यामुळे आजच्या घडीला परीक्षा महत्त्वाची आहे का, हे प्राधान्यक्रमाने ठरवायला पाहिजे. कोरोनामुळे आता जीवन जगणे हीच महत्त्वाची बाब मानली पाहिजे. त्यामुळे परीक्षा आणि इतर बाबीना दुय्यम स्थान मानले तरी वावगे ठरणार नाही. परीक्षा महत्त्वाच्या आहेत. मात्र, तुम्ही जीवंत राहिला, तरच पुढील सर्व काही मिळणार आहे. फायदा, तोटा, चांगले वाईट यापेक्षा आज वर्तमनाला महत्त्व देणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीमध्ये योग्य बदल होणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारण चिकटले आहे. त्यामुळे राजकारण्यांनी शिक्षण संस्थांवर आपले वर्चस्व ठेवले आहे. सरकारी शिक्षण संस्थांपेक्षा खासगी शिक्षण संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय शिक्षण पद्धती बंद पडतील की काय असा प्रश्न पडला आहे. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील आणि गरिबांची मुले शिक्षणापासून कोसो दूर राहतील आणि समाजामध्ये पुन्हा मोठी दरी निर्माण होईल की काय अशी शंका शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

शहरांमध्ये अडकलेला मजूरवर्ग गावाकडे जाण्यासाठी अतूर झाला आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दोन दिवसांपासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. परीक्षेच्या संदर्भात होणऱ्या विचारमंथनाकडे पाहताना करोनाच्या बातम्यांकडे कानाडोळा करून चालणर नाही. करोनाचे अक्राळविक्राळ स्वरूप पाहून अंगाचा थरकाप होतो. वृत्तपत्रे, आकाशवाणी, टीव्ही, सर्व वृत्तवाहिन्या, सोशल मीडियामधून मिनिटामिनिटाला धडकी भरवणाऱ्या बातम्या देत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांची संख्या, परदेशात होणारा हाहाकार, एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची रोज वाढणारी संख्या. देशात सुरू असलेला लॉकडाउन, डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार सारे सेवाव्रती जीव धोक्यात घालून या महामारीचा मुकाबला करीत आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान दर चार दिवसांनी जनतेशी संपर्क साधत आहेत. लाखो लोक भूकेने व्याकूळ झालेले आहेत. हजारो संस्था त्यांची भूक भागविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

करोना व्हायरसच्या संसर्गाचे स्वरूप दिवसेंदिवस गडद होताना आपण पाहात आहोत. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे, भविष्यात उद्भवणारे प्रश्न आज वर्तमानात आपल्याला सतावत आहेत. रोजगार, उद्योग, अर्थ, शिक्षण, आरोग्य, जगण्याची धडपड, सतत सतावणाऱ्या चिंता, अशा सर्व प्रश्नांची चर्चा सुरू आहे. विविधांगांनी विचार व्यक्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र सध्या चर्चेने ढवळून निघाले आहे. दहावीच्या परीक्षा संपल्या असल्या, तरी काही विषयांचे पेपर राहिले होते. त्या विषयांची परीक्षा आता होणार नाही, त्या विषयामध्ये पास केले जाणार आहे. बारावीची परीक्षा पूर्ण पार पडली असली, तरी पेपर तपासणीसंबंधी समस्या सतावत आहेत. विद्यापीठ पातळीवरील परीक्षांसंदर्भात अद्याप मार्ग सापडलेला नाही.

शैक्षणिक वर्ष जूनपासून प्रारंभ होण्याची रुढ पद्धती आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचे, याबाबत मात्र, कमालीची मतभिन्नता आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. एसएससी (दहावी) आणि एचएससी (बारावी) बोर्ड निकालाबाबत निश्चित तारीख सांगू शकत नाहीत. शिक्षक संघटना आपापल्या अडचणी मांडत आहेत. विद्यार्थी आणि पालकवर्ग हवालदिल झाले आहेत. सर्वांच्या मनावर एकप्रकारचे मोठे दडपण आहे. भविष्याचे चित्र अस्पष्ट झाल्यासारखे त्यांना वाटते आहे. विद्यार्थी, पालक, शाळा-महाविद्यालये, वेगवेगळ्या विषयांच्या शिकवण्या घेणारे क्लासवाले, संस्थाचालक, नगर परिषद, जिल्हा परिषद, शिक्षण खाते, प्रशासन, सरकार अशा सर्वांसमोर अंधार डोकावत आहे. यंत्रणेजवळ उत्तर नाही. अशा सर्व परिस्थितीत सर्व घटक असे असह्य झालेले असताना कोणाला दोष देणार? प्रत्येक घटकासमोरील प्रश्नाचे स्वरूप भिन्न असले तरी मूळ गाभा एकच आहे.

परीक्षांचा प्रश्न महत्त्वाचा आहे का, जीवन-मरणाचा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. म्हणजे अंडे अगोदर की कोंबडी अगोदर? परीक्षा म्हणजे काय? कोणी तरी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे एवढेच? किंवा तोंडी परीक्षा वा प्रॅक्टिकल म्हणजे तरी काय? दोन तासांच्या आत आपल्या कुवतीप्रमाणे त्यातून बाहेर पडणे इतकेच? हे सारे तरी कशासाठी? तर गुण अधिक मिळावे म्हणून. गुण मिळविणारे ‘मार्क्सवादी’ विद्यार्थी. गुणवत्तेशी परीक्षांचा खरंच किती संबंध असतो, हाही एक अभ्यासाचा, चर्चेचा, संशोधनाचा विषय झाला आहे. परीक्षा पद्धतीवर वर्षानुवर्ष चर्चा चालूच आहे.

परीक्षेच्या संदर्भात सरकारचे आदेश, परिपत्रके याद्वारे दिलेल्या सवलती, उदा. बेस्ट फाइव्ह; तसेच आपल्या संस्थेचा निकाल चांगला लागला, हे दाखविण्यासाठी चालू असलेली काही शैक्षणिक संस्थांची केविलवाणी धडपड. कॉपी प्रकरणे, त्याला मिळणारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत. हा सर्व एक प्रकारे परीक्षेत सुरू असलेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. शिक्षण म्हणजे निरंतर चालू असलेली जीवनसाधना आहे. याचा विसरच परीक्षा पद्धतीला पडला आहे. सारांशाने बोलायचे झाले, तर आजच्या परीक्षांचा उद्याच्या यशस्वी जीवनाशी फारसा संबंध नसतो. जीवन यशस्वी व समाधानकारक जगण्यासाठी परीक्षेशिवाय इतर अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

त्यांची मुले इंग्रजी शाळेत…
गुण वाढत असले तरी, गुणवत्तेचे काय या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. अलीकडे पंचतारांकित शाळा-महाविद्यालये होत असल्याने वरचा रंग कमालीचा बदलला आहे. मात्र, अंतरंग त्या तुलनेत बदलतोय का, हे पाहणे देखील तेवढेच महत्त्ववाचे ठरत आहे. दिल्ली बोर्ड आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या मपाठी शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत, त्याकडे कोणी गांभीर्याने पाहताना दिसत नाही. मराठी टिकली पाहिजे, अशी व्यासपीठावरून आरोळी ठोकणाऱ्यांचीच मुले परदेशात शिक्षण घेत आहेत, हे कोणी पाहात नाही. शिक्षकसुद्धा आपली नोकरी टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था शिक्षकांना किमान वेतनसुद्धा देत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, तरीसुद्धा त्याकडे कोणी गांभीर्याने पाहताना दिसत नाही.