राज्यात पुढील महिन्यापासून सुरु होणार शाळा, असं असणार प्रत्येक वर्गाचं TimeTable

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १५ जून २०२० पासून ऑनलाइन त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसेच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत परवानगी दिली आहे.

शैक्षणिक वर्षास मान्यता देताना मुख्यमंत्री म्हणाले कि, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार करायला हवा. हे लक्षात घेता ऑनलाइन, डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबविण्यात यावी तसेच विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि शहरांपासून दूर असलेल्या शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज दुपारी झालेल्या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. एकवेळ शाळा सुरु झाली नाही, तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सोबतच ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत. तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कशा पद्धतीने सुरु होणार शाळा ?
मिळालेल्या माहितीनुसार, रेड झोनमध्ये नसलेली ९ , १० १२ वी शाळा-महाविद्यालये जुलैपासून, तसेच सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि तिसरी ते पाचवीर्यंतचे वर्ग सप्टेंबरपासून सुरु होतील. तर पहिली आणि दुसरीचे वर्ग व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु करण्यात येणार आहे. तसेच ११ वीचा वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरु करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान दहावीचा निकाल पुढील महिन्यात लागणार आहे. त्याचप्रमाणे शाळा सुरु होणार नाहीत अश्या ठिकाणी टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करण्यात यावे, आणि त्याचा बारकाईने आढावा घेत काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी, असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाइन नाही
शिक्षण ऑनलाइन देण्याबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आला आहे. यात पहिली व दुसरीची मुले लहान असल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन शिकवणी दिली जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.