‘राज्यपाल भाजपा कार्यकर्त्याच्या मानसिकतेत’, शिवसेनेचे पुन्हा ‘टीकास्त्र’

पोलिसनामा ऑनलाईन – देशासह राज्यात कोरोनामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून तातडीने निर्णय घेतले जात नाहीत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा दावा विरोधी दावा केला आहे. राज्यपाल समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मुद्दा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. समांतर सरकार आणि भाजपा नेते या दोन्हींवर शिवसेनेने पुन्हा एकदा  तोफ डागली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना टोले लगावत टीका केली आहे. ‘कोरोनाविरुद्धची लढाई साधी नाही. राज्यव्यवस्थेतील प्रत्येक घटक त्यात सहभागी झाला आहे. राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधानांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपासून राजभवनांपर्यंत प्रत्येकानेच या लढयात उतरायचे आहे. कोरोनाबरोबरच्या लढाईत आपले योगदान हवे असे सगळयांनाच वाटते. मग आमच्या राज्यपालांना तसे वाटले व त्यांनी राजभवनात बसून काही कार्य केले तर बिघडले कुठे? आम्ही म्हणतो करू द्या.

राज्यपालांनी कोरोनासंदर्भात राजभवनात बसून प्रशासकीय यंत्रणा राबविली  म्हणून टीकेचा सूर उठला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी संसदेतील सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेसह सर्व नेत्यांनी स्पष्ट सांगितले की, या लढाईचे नेतृत्व पंतप्रधान मोदीच करतील. तेच सेनापती आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करीत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिली. त्याच वेळी पवार आणि शिवसेना नेत्यांनी राज्यपालांच्या ‘भूमिके’बाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना माहिती दिली, त्यात कटुता नव्हती. अशा युद्धप्रसंगी निर्णय व सूचनांचे केंद्र एकच असावे, दिल्लीत पंतप्रधान व राज्यात मुख्यमंत्री यांनीच प्रशासनास सूचना द्याव्यात. दुसरे कोणी परस्पर, समांतर सरकार चालवत असेल तर गोंधळाचे वातावरण निर्माण होईल असे पवारांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यास वाटत असेल तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे. आपल्या राज्यपालांना कामाची आवड आहे. ते आज राजभवनात आले असले तरी कालपर्यंत ते संघाचे प्रचारक आणि भाजपचे कार्यकर्तेच होते. त्यामुळे आजही ते कदाचित कार्यकर्त्याच्याच मानसिकतेत असावेत अशा  मुद्यावरून शिवसेनेने ‘सामाना’तून राज्यपालांवर टीका केली.