Lockdown in Maharashtra : राज्यात काही काळासाठी कडक निर्बंध (Lockdown) लावावेच लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनिवारी सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. अडीच तास चाललेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असे सांगण्यात आले. लोकांचा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन जितका महत्त्वाचा आहे तितकेच लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेल्याना कशा प्रकारे मदत करता येईल याचे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संसर्ग थांबवायचा असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. मात्र, हे करत असताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीत विरोधकांनीही काही सूचना केल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांना विश्वासात घेऊनच लॉकडाऊन जाहीर करावा. लोकांसमोर लॉकडाऊनचा रोड मॅप मांडा अन् मगच निर्णय घ्या, असा आग्रह त्यांनी बैठकीत धरला. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास सहमती दर्शविली. सोमवारी कष्टकऱ्यांना सरकारतर्फे काय दिलासा देता येईल याबाबत निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाने जे अनर्थचक्र राज्यावर ओढवले आहे. ते थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील. तुम्ही त्याला लॉकडाऊन म्हणा की आणखी काही. आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन असेल आणि नंतर गरजेनुसार तो एक आठवडा वाढविला जावा किंवा सुरुवातीलाच १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, असे दोन पर्याय आहेत.