मोठी बातमी ! आगामी एक-दोन दिवसांत राज्यात कठोर निर्बंधाची घोषणा होण्याची शक्यता – आरोग्यमंत्री

मुंबई : पोलीसनाम ऑनलाइन –  राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सुरु असतानाच विरोधी पक्षाकडून राज्य शासनावर टीका होत आहे. तर यावरून आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर एक-दोन दिवसांत कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे म्हणाले, २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा टोपे यांनी फेटाळून लावली आहे. लॉकडाऊनसंदर्भात सध्या तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे ते म्हणाले. तर लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावले आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा केली जाईल. असे ते म्हणाले. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा सुद्धा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला आहे.

टोपे पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी नागरिक कमीत-कमी १५ दिवस गेले नाही, तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, याबरोबरच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. अशी त्यांनी माहिती दिली आहे. या दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे . तर राज्यात बुधवारी कोरोनाच्या ३९ हजार ५४४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. या परिस्थीवरून राज्य सरकार काय निर्णय घेतय यावर लोंकाचे लक्ष लागून आहे.