Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4907 नवे पॉझिटिव्ह तर 125 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत आहे. आज राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले. गेल्या २४ तासांत ९ हजार १६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२३ टक्के झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राज्यात ५ हजारांपेक्षा कमी कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४ हजार ९०७ नव्या बाधित रुग्णांची वाढ झाली असून, १२५ रुग्णांचा जीव गेला आहे. तर आजवर ४५ हजार ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आता १७ लाख ३१ हजार ८३३ वर गेली आहे. त्यातील १५ लाख ९७ हजार २५५ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर सध्या ८८ हजार ७० रुग्णांवरती राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख ३२८ नमुन्यांपैकी १७ लाख ३१ हजार ८३३ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८.०४ टक्के आहे. आताच्या घडीला राज्यात ९ लाख ४१ हजार ११८ जण घरगुती विलगीकरणात आहेत. तर ६ हजार ५५१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.