कोरोना व्हायरस : भारताच्या अडचणींत वाढ करू शकतो ‘हा’ नवीन ट्रेंड !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना व्हायरस संसर्ग प्रकरणांत भारतात वेगाने वाढ होत असून मृतांचा आकडा १०० च्याही वर गेला आहे. जगातील बऱ्याच देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा इतका तीव्र प्रसार झाला नाही, परंतु संसर्गाच्या नव्या ट्रेंडमुळे देशातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आता देशातील एक तृतीयांश जिल्ह्यामध्ये झाला आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांचा ताबा घेतल्यानंतर हे साथीचे प्रमाण ७३६ जिल्ह्यांपैकी ३०० जिल्ह्यात पसरले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बर्‍याच मोठ्या राज्यांतील ६० टक्क्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणू एका भौगोलिक क्षेत्रात मर्यादित ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हा धक्का बसू शकेल.

सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होण्याचा धोका खूप जास्त आहे. दरम्यान, राजस्थानातील भिलवारामध्ये यश संपादन केले गेले आहे, जे देशातील १० कोरोना हॉटस्पॉटपैकी एक आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाची वेगवान गती कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखू शकते, दरम्यान, सध्यातरी सरकारपुढे मोठे आव्हान उभे आहे. कारण आता कोरोना विषाणूचा प्रसार उत्तराखंडमधील देहरादून, उत्तर प्रदेशमधील मेरठ, राजस्थानमधील जयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये होताना दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू संपूर्ण देशात एकसारखा पसरणार नाही. आम्ही कोरोना व्हायरस हॉटस्पॉटवर बारीक लक्ष ठेवत आहोत. जास्त कोरोना प्रभावित भागात चाचणीची संख्या वाढवून हे थांबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. नोएडा, म्हैसूर, बेंगलुरु, मुंबई आणि पुणे येथेही कोरोनाची जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जात आहे. यादरम्यान, महानगरांमधून ग्रामीण भागात लोक स्थलांतरित झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याचेही म्हंटले जात आहे. लॉकडाउन लागू झाल्यानंतरही भारतीय महानगरांतून मोठ्या संख्येने लोक लहान शहरे किंवा खेड्यांमध्ये स्थलांतरित झाले.

सरकारने यापूर्वीच देशभरातील २२ हॉटस्पॉट्सची ओळख पटविली असून तेथे कोरोना रूग्णांचा तपास करत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. दरम्यान, व्हायरसचे सतत वाढत असलेले हॉटस्पॉट्स सरकारी यंत्रणा आणि संसाधनांवर अतिरिक्त दबाव आणत आहेत. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या आरोग्य यंत्रणेच्या सहाय्यक उपाध्यक्षा डॉ. प्रीती कुमार यांनी सांगितले की, साथीचा रोग जसजसा पसरला जाईल तसतसा देशाच्या विविध भागात उदयास येईल. संसर्गाची ओळख, चाचण्या, प्रभावी लॉकडाउन आणि नागरिकांच्या बुद्धिमत्तेसह अनेक घटकांवर साथीचा प्रतिबंध आधारित आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भारतात अद्याप बऱ्याच घटना आढळल्या नाहीत कारण अनेक लोकांत संसर्गाची लक्षणे शुन्याबरोबर आहेत. असे लोक कोरोना विषाणूचे वाहक बनू शकतात, परंतु त्यांना रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. याचा परिणाम असा होईल की या भागांना हॉटस्पॉट म्हणून देखील ओळखले जाणार नाही. तसेच जागतिक स्तरावर हे सिद्ध झाले आहे की कोरोना विषाणूच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे दिसतात किंवा कोणतीही लक्षणे अजिबात दिसत नाहीत. अशा परिस्थितीत ही प्रकरणे नोंदवली जात नाहीत.