‘प्रविण दरेकरांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीसांना तरी समजला का ?’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत राज्यात काही निर्बंध लागू केले आहेत त्याचबरोबर लॉकडाऊनचाही इशारा दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. यावरून शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनातून दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन राज्यात आढळून आला आहे. तो वेगाने पसरत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती. ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ असे दरेकर यांनी म्हंटले होते. त्याला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिल आहे.

कोरोनाची दुसरी लाट राज्यात धडक मारते आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिल्ह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. मुंबईत हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागरिकांचा हलगर्जीपणाही वाढला. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समोर येऊन सगळ्यानांच कडू औषधाचा डोस पाजावा लागला.सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणण्याबरोबरच काही निर्बंध लागू करण्यात आले. लोकांनी शिस्त नाही पाळली तर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लॉक डाऊनचा इशारा दिला होता. अशा संकट प्रसंगी कोणीही राजकरण न करता सरकार आणि विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे. एकोप्याने काम करणे गरजेचे आहे. मात्र मुख्यमंत्र्यानी लॉकडाऊनचा इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका. दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात….
‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोरोना संसर्गाची सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे? यापूर्वी करोनाच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात कुचकामी आहे, हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत. पण मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे,” असे शिवसेनेनं म्हंटल आहे.

मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉकडाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही.

राज्यातील विरोधी पक्ष हा याच मातीतला आहे तो काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल,” असा सल्लाही शिवसेनेनं भाजपा नेत्यांना शेवटी दिला आहे.