Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 17066 नवे पॉझिटिव्ह तर 257 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उच्चांकी रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 17 हजार 066 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 77 हजार 374 झाली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. राज्यात सध्या रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 20.2 टक्के आहे.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यू दर 2.77 एवढा झाला आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 15 हजार 789 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. राज्यात आतापर्यंत 7 लाख 55 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.16 टक्के एवढं आहे.

सध्या राज्यामध्ये 2 लाख 91 हजार 256 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 17 लाख 12 हजार 160 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 198 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 53 लाख 21 हजार 116 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 लाख 77 हजार 374 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.