Coronavirus : भारतात सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेपेक्षा जास्त ‘कोरोना’चे रूग्ण, 24 तासात 51050 नवे पॉझिटिव्ह तर 803 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या १८ लाख ५५ हजार ७४६ झाली आहे. सोमवारी ५२,०५० नवीन रुग्ण आढळले आणि ८०३ लोक मरण पावले. सर्वाधिक महाराष्ट्रात ८,९६८ आणि आंध्र प्रदेशात ७,८२२ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी देशात ४३ हजार ७० लोक बरे देखील झाले आहेत. यासह बरे झालेल्या रुग्णांची संख्याही १२ लाखांच्या पुढे गेली आहे. रिकव्हरी रेट सध्या ६६.३४% आहे. म्हणजेच प्रत्येक १०० रूग्णांमध्ये ६६ लोक बरे होत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे ५ लाख ८६ हजार २९८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ३८ हजार ९३८ लोक मरण पावले आहेत. तसेच दिलासादायक बाब ही आहे की, आतापर्यंत एकूण १२ लाख ३० हजार ५०९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

दिल्ली-मुंबई आणि चेन्नईमध्ये कमी झाला कोरोनाचा वेग
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, देशातील या तीन महानगरांमध्ये कोरोनाचा वेग कमी झाला आहे. अभ्यासात आढळले आहे की, कोविड-१९ च्या आर-व्हॅल्यू किंवा रिप्रॉडक्टिव्ह व्हॅल्यूमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये घट झाली आहे, हे दर्शवते की देशातील या तीन मोठ्या शहरांमध्ये महामारी संपण्याच्या मार्गावर आहे

महाराष्ट्रात एका दिवसात आली ८,९६८ नवीन प्रकरणे
सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाची ८,९६८ नवीन प्रकरणे आढळल्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या वाढून ४,५०,१९६ वर गेली आहे. आणखी २६६ रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यात या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून १५,८४२ झाली आहे. राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून २,८७,०३० वर पोचली आहे.

तामिळनाडूमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाखावर
तामिळनाडूमध्ये सोमवारी संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली. राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत राज्यात संसर्गाची ५,६०९ प्रकरणे आढळली. यासह आता संक्रमितांची संख्या २,६३,२२२ झाली आहे. येथे संक्रमणामुळे १०९ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या ४,२४१ वर गेली.

दिल्लीत रिकव्हरी रेट वाढला, नवीन प्रकरणांमध्येही घट
दिल्लीत कोविड-१९ च्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा दिसून आली आहे. दिल्लीत रिकव्हरी रेट वाढला असून नवीन प्रकरणांमध्येही घट झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ८०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राज्यात कोविड-१९ संक्रमितांची संख्या १.३८ लाखांवर गेली आहे. तर सोमवारी उत्तर प्रदेशात विक्रमी ४ हजार ४४१ नवीन प्रकरणे वाढली. येथे संक्रमितांची संख्या आता ९७,३६२ वर पोहोचली आहे. येथे ५० रुग्णांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत कोणत्या राज्यात किती मृत्यू?
मृत्यूच्या एकूण ३८,१३५ पैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १५,८४२, तामिळनाडूमध्ये ४,१३२, दिल्लीत ४,२४१, कर्नाटकमध्ये २,४९६, गुजरातमध्ये २,४८६, उत्तर प्रदेशमध्ये १,७३०, पश्चिम बंगालमध्ये १,६७८, आंध्र प्रदेशमध्ये १,४७४ आणि मध्य प्रदेशमध्ये ८८६ लोकांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत राजस्थानामध्ये ७०३, तेलंगणामध्ये ५४०, हरियाणामध्ये ४२३, पंजाबमध्ये ४२३, जम्मू-काश्मीरमध्ये ३९६, बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये १९७, झारखंडमध्ये ११८, आसाममध्ये १०५, उत्तराखंडमध्ये ८६ आणि केरळमध्ये ८२ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे.