Coronavirus : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! बाधितांना रूग्णालयात नेण्यासाठी खासगी रूग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची कमतरता भासत आहेत. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यामध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्या कडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाच गरज भासल्यास, खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्ण वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे.

कोरोना काळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहीत करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. 24 तास ह्या अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालीका क्षेत्र वगळता) आणि महापालीका आयुक्त (महापालीका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे. यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर याचा विचार करण्यात यावा असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथाव जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना स्थानिक परिवहन मंडळ, राज्य परिवहन, चालक पुरवठा कंपन्या, स्थानिक प्रशासनाकडील वाहनचालकांच्या सेवा अधीग्रहीत करून चालक उपलब्ध केले जातील. या चा खर्च स्थानिक प्रशानामार्फत केला जाईल.

लक्षणे नसलेल्या तसेच इतर रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने या अधीग्रहीत केलेल्या वाहनांमध्ये किरकोळ बदल करून रुग्ण वाहक वाहन म्हणून त्याचा वापर करावा व आवश्यकते नुसार वाहने ताब्यात घ्यावीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयात म्हटले आहे.