Coronavirus : आतापर्यंत ‘कोरोना’मुक्त झालेल्या 19 रूग्णांना घरी सोडलं

मुंबई : वृत्तसंस्था –  महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे असताना राज्यामधील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी आपली रुग्णालये बंद ठेवू नयेत,तसेच अशा परिस्थिती मध्ये संवेदनशीलता दाखवत डॉक्टरांनी रुग्णालये सुरु करून नागरिकांना सेवा द्यावी. संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबिरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे,असे आवाहन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने करण्यात आले.कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्य शासन सध्या टेस्टिंग,ट्रेसिंग,आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील १९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून,त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.तर राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक च्या माध्यमातून संवाद साधताना दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक संवादातील काही महत्वाचे मुद्दे :

• राज्यात सध्या १४७ कोरोना बाधित रुग्ण आहे.आतापर्यंत ४२२७ जणांची कोरोनाबाधित चाचणी केली असून त्यापैकी ४०१७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर १४७ जणांचे पॉझिटिव्ह आले.

• कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या उपचारसाठी खाजगी रुग्णालये सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे.गरोदर महिला,लहान मुलांचे आजार,हृदयविकाराचे रुग्ण,यांना वेळीच उपचारासाठी गरज असते.त्यासाठी राज्यातील खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये सुरु ठेवावी.संचारबंदीकाळात पोलीस आवश्यक ते मदत करतील.कोरोनाच्या भीती पोटी रुग्णालये बंद ठेवू नका.

• आरोग्य विभागातील डॉक्टर,कर्मचारी वर्ग तसेच अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी जे जीव धोक्यात घालून काम बजावत आहे.त्यांचे अभिनंदन.व अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे.

• राज्यामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते.अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी. जिल्हा प्रशासनला सहकार्य करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.तसेच रक्तदान शिबिरे घेताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

• ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे.उपचाराला योग्य प्रतिसाद देत आहेत. तेच लोक कोरोना मुक्त होत आहे.

• जनतेने सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये.सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संघटना,मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

• बाधित झालेल्या रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने सध्या व्यक्तींचे ट्रेसिंग नंतर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध,तपासणी,आणि उपचार असे त्रिसूत्रीकप्रमाणे काम करण्यात येत आहे.