‘कोरोना’च्या लसीकरणात जनतेचा सहभागही महत्त्वाचा !

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोविड शिल्ड’ आणि भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सिन’ आणि फायझरने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज दिला आहे. देशात सहा लशींची मानवी चाचणी केली जात आहे. शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदील मिळताच मोठ्या प्रमाणांवर लसीचे उत्पादन सुरु केले जाईल, असे सांगत कोल्डचेनच्या तयारीचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात तीन कोटी हेल्थ आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव भारत भूषण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भारत भूषण म्हणाले, कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस तयार करणाऱ्या औषधी कंपन्यांना भेट देऊन आढावा घेतला होता.उत्पादनसोबत कमी वेळेत प्रत्येकासाठी लस उपलब्ध होईल, यादृष्टीने व्यापक तयारी केली आहे, असे राजेश भूषण यांनी सांगितले.

भूषण म्हणाले तज्ज्ञांचे पथक लोकसंख्या, लस खरेदी, लस वितरण आदी महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करीत आहेत. लसीकरणासाठी को-विन एप तयार करण्यात आले. लस दिल्यानंतर डिजिलॉकरमध्ये लसीकरण प्रमाणपत्र येईल. शीतकरण साखळीच्या तयारीच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य आणि कोविड-१९ लढ्यातील अग्रणी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले केले जाईल. देशात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४ लाखाहून कमी आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नवीन रुग्ण आढळण्याचा दरही कमी होत आहे. देशातील पाच राज्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५४ टक्के आहे. यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, प. बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

अन्य देशांनाही पुरवठा करण्यास सक्षम…
कोरोना कृती दलाचे चेअरमन आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले भारतात आवश्यक तेवढी लास तयार करण्यास आपण सक्षम आहोत. त्याचबरोबर आपण अन्य देशांनाही लसीचा पुरवठाही करण्यास सक्षम आहे असे म्हंटले आहे.

९९ वर्षांच्या भवतारिणी समंता यांची कोरोनावर मात
कोरोना वृद्ध व्यक्तींसाठी जीवघेणा मानला जातो. परंतु, जगण्याच्या तीव्र इच्छेतून वयोवृद्धही कोरोनावर विजय मिळवत आहेत. पश्चिम बंगालच्या भवतारिणी समंता यांचा १०० वा वाढदिवस काहीच महिने दूर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु डॉक्टर आणि समंता यांच्या कुटुंबांतील सदस्यांना आश्चर्याचा धक्का देत भवतारिणी यांनी कोरोनाला पराभूत केले. समंता यांना ९९ वर्षे ११ महिने या वयात ताप, श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी फुलेश्वर भागातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी त्या कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

रुग्णालयाचे संचालक शुभाशिष मित्रा म्हणाले की, समंता यांच्यावरील उपचारांसाठी डॉक्टरांची तुकडी तयार केली गेली. ‘वेळच्या वेळी काळजी घेतल्यामुळे त्या बऱ्या होत गेल्या. त्यांना आम्ही कोरोनातून मुक्त करू शकलो व १०० व्या वाढदिवसाआधी त्यांना घरी पाठवू शकलो याचा आनंद आहे.’

तब्बल १५१ दिवसांनी काेराेना रुग्णाचा आकडा २७ हजारांच्या खाली
नवी दिल्ली : काेराेनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट हाेत असून तब्बल १५१ दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा २७ हजारांच्या खाली आला आहे. देशभरात २६ हजार ५६७ नवे रुग्ण आढळले. तसेच मृतांच्या संख्येतही घट नाेंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही घटला आहे.यापूर्वी १० जुलैला २६ हजार ५०६ नवे रुग्ण आढळले हाेते. त्यानंतर ११ जुलैला हा आकडा २७ हजारांच्या पुढे गेला हाेता. देशात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली हाेती. दिवाळीपूर्वी तीन नाेव्हेंबरला २८ हजार नवे रुग्ण आढळले हाेते. मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली असून हा आकडा ३९ हजार ०४५ इतका नाेंदविला. देशभरात एकूण ९१ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाले असून १ लाख ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ३ लाख ८३ हजार एक्टिव्ह रुग्ण आहेत.