… तर ठाणे, नवी मुंबईप्रमाणे पुण्यातही कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर लॉकडाऊनचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळले नाहीत तर ठाणे आणि मुंबई प्रमाणे पुण्यात देखील कडक लॉकाडाऊन जाहीर करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

पुणे शहराप्रमाणेच पुणे ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहे. मात्र, घराबाहेर पडताना मास्कचा न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. अशीच परिस्थिती राहिली तर प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा थेट इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढली आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायती क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांसोबत जनजगृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागात नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्या पार्श्वभूमीवर भरारी पथके तयार करण्यात आली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.