Coronavirus : रेल्वे 15 एप्रिलपासून सुरू करणार सेवा, सर्व कर्मचार्‍यांना तयार राहण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपत असून 15 तारखेपासून रेल्वे सेवा पुन्हा सुरु होणार आहे. सुत्रांनी सांगितले की, सर्व सुरक्षा कर्मचारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, टीटीई आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांनी 15 एप्रिल पासून आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यास तयार राहण्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं या सरकारच्या आदेशाच्या रेल्वे बोर्डाला प्रतिक्षा आहे. मात्र, तत्पूर्वी रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वे बोर्डांना रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याच्या नियोजनाबबात विचारणा केली आहे. यामध्ये 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यास सांगितले आहे. या माहितीला रेल्वे झोन्सच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वेने आपल्या सर्व सेवा 22 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. फक्त या काळात ज्या रेल्वे गाड्या त्यांच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान 15 एप्रिलपासून शंभर टक्के रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अद्याप मंत्रालयाशी बोलणं झालं नसल्याचे विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरी लॉकडाऊन संपल्यास 15 तारखेपासून 13000 रेल्वे सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.