Coronavirus : परिस्थिती चिंताजनक ! राज्यात Lockdown अटळ? मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येची भर पडत आहे. रुग्ण वाढण्याचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने रुग्णालयात बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि त्याबाबत करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आज घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग रोखण्यावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालवी. तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

यामुळे मृतांची संख्या वाढू शकते…

या बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा परिणाम सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधावर होऊ शकतो. विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना बेड्स उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे व्यास यांनी निदर्शनास आणून दिले.

व्यास यांनी सांगितले की, सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटांपैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या असून उर्वरित खाटा वेगाने भरल्या जात आहे. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटापैकी 12 हजार 701 खाटा, 19 हजार 730 खाटापैकी 8 हजार 342 खाटा यापूर्वीच भरल्या आहेत. तर 9 हजार 30 व्हेंटिलेटरर्सपैकी हजार 881 वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यामध्ये तर खाटाच उपलब्ध होत नसल्याने संसर्ग वाढिच्या प्रमाणात सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

वेळीच चाचणी न केल्यास गंभीर परिणाम दिसत आहेत

मागील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 3 लाख सक्रिय रुग्ण होते आणि 31 हजार 351 मृत्यू झाले होते. तर 27 मार्च रोजी राज्यात 3 लाख 3 हजार 475 सक्रीय रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या 54 हजार 73 झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्याप्रमाणात मृत्यू वाढू शकतात यामागे वेळेवर चाचणी न करुन रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे. तसेच होम क्वारंटाईन असताना नियमांचे उल्लंघन करणे, ही कारणे असू शकतात. असे टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले.

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री

बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले. ते म्हणाले, एकीकडे आपण कोरोना परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा अटोकाट प्रयत्न कर आहोत. मात्र, अनेक घटक अद्यापही गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह संमारंभ नियम तोडून सुरु आहेत, बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क यांचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

सर्व ठिकाणी सुविधा हवी

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही, अशी भीती आहे. ती त्वरित काढणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा. तसेच केवळ मुंबई-पुणे या शहरांवर लक्ष केंद्रीत न करता राज्यातील सर्व भागांवर लक्ष केद्रीत करा. सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीतील महत्तवाचे निर्णय

– गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा
– मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन करावे. याची कार्यपद्धती (SOP) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करुन नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊन अंमलबजावणी करता येईल.
– ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध रहावा.
– मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
– विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
– सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करु द्यावे.
– प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळवण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी