Coronavirus : ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू – रामदास आठवले

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीमजयंती साजरा करा. या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आधी करोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात दरवर्षी 14 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होते. यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढी पाडव्याच्याही शोभायात्रा रद्द झाल्या. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत आणि घरीच जनतेने राहून येत्या 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करावा असे सांगत आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वतःचे भक्षक असं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणार्‍या कामगारांसाठी एक हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे आठवले यांनी स्वागत केले आहे. कोरोनामुळे हातावर पोट असणारे असंघटित कामगार, गोर गरीब झोपडीवासियांचे, रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे. ज्यांनी कर्ज घेतले आहे अशा लोकांचे मासिक हफ्ते भरण्यास बँकांनी मार्च आणि एप्रिल महिन्याची सूट द्यावी. दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खासगी उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे