उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे-मटन खा, कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड

बुलडाणाः पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोरोनाकाळात मंदिर बंद आहेत. देव पण लॉक केले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वतः घ्या. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. दिवसाआड चिकन खा अन् प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला आमदार गायकवाड यांनी लोकांना दिला आहे. यावरून वारकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे. याबद्दल अनेकांनी आमदार गायकवाड यांना फोन करून निषेध व्यक्त केला आहे.

यात एका वारकऱ्याने आमदार गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. आमदार गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. हे बेताल वक्तव्य करून आतापर्यंत सनातन हिंदू समाजाने शाकाहार सोडून मांसाहारकडे वळावे असे दिसतेय. आमदार गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे, अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

काय आहे ऑडिओ क्लीपमध्ये?
तुम्हाला काय वाटायचे ते वाटू द्या. पण मी दररोज 20-25 जणांच्या अस्थी जाळत आहे. तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित आहे. पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही. परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचे लॉकडाऊन 30 मेला संपणार आहे. त्यानंतर 31 मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होत? असेही आमदार गायकवाड यांनी बोलत असल्याचे ऐकायला मिळत आहे.