Lockdown in Maharashtrra : 1 जूननंतर देखील कडक निर्बंध? कोविड कंट्रोल करण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागणार, CM उध्दव ठाकरेंचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्संख्या आटोक्यात येत असली तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अद्याप पूर्ण यश आले नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व त्याचे लहान मुलांवरील परिणामांबाबत सध्या अंदाजच आहेत. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा म्हणजे राज्यात 1 जूननंतरही कडक निर्बंध राहतील, याचे संकेत मानले जात आहेत.

माझा डाॅक्टर या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी (दि. 23) कोरोनाविषयक बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील 6 हजार 300 बालरोगतज्ज्ञांना उपचारांबाबत ऑनलाइन मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञांसह इतर संस्था, संघटनेतील सुमारे 52 हजार डॉक्टर्स व नागरिकांनी विविध माध्यमांतून हा ऑनलाइन कार्यक्रम पाहिला. सर्व डाॅक्टर, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे विविध पक्षांचे लोक आणि नागरिकांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश येत असल्याचे सांगतानाच मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य शासनाच्या बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्षपद डॉ. सुहास प्रभू यांच्याकडे असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. त्यांनी लहान मुलांमधील कोविड संसर्ग आणि वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली. मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनीही सूचना केल्या. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचे चांगले परिणामही समोर येत आहेत. असे असले तरी लगेचच 1 जूनपासून राज्यातील सर्व निर्बंध हटविले जातील, हा समज चुकीचा आहे. तयारीचा आढावा घेऊन सर्व बाबी सकारात्मक असतील, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून नंतरच निर्बंध काही अंशी शिथिलतेबाबत निर्णय होऊ शकेल. पूर्णपणे निर्बंध हटविले जातील, या भ्रमात राहू नये, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.