… म्हणून अजित पवारांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी पोलिस आणि डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. ‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणार्‍या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणार्‍यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाही चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने कोरोना’चे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे असेही पवारांनी स्पष्ट केले.