प्रसिद्ध अभिनेते अलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवलंय : कोर्ट

मुंबई : वृत्तसंस्था – विनता नंदा यांनी स्वत:च्या फायद्यासाठी अभिनेते आलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याची शक्यता नाकारत येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले. मीटू मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक- निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथांवर बलात्काराचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी आलोक नाथ यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. विनता नंदा यांनी घटनेनंतर ताबडतोब तक्रार दाखल न केल्याने आरोपांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे असे म्हणत कोर्टाने आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
तसेच विनता नंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत बऱ्याच गोष्टी तथ्यहीन आहेत असे अलोकनाथ यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान म्हटलं. ‘विनता नंदा यांना घडलेली संपूर्ण घटना लक्षात आहे पण कोणत्या तारखेला घडलं हेच लक्षात नाही. त्यामुळे आलोक नाथ यांच्यावर खोटे आरोप होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विनता नंदा यांनी म्हटल्यानुसार बलात्काराची घटना जर त्यांच्या घरी घडली तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाही. आता विनता नंदा आणि आलोक नाथ हे दोघेही दुसऱ्या व्यक्तींशी विवाहित असल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात अर्थ नाही. आलोक नाथ यांची वैद्यकीय तपासणी करणे फक्त औपचारिकता ठरेल,’ असेही कोर्टाने स्पष्ट केले.
विनता नंदा यांनी  या ‘घटनेनंतर ताबडतोब तक्रार दाखल करण्याबाबत मित्रमैत्रिणींचा सल्ला घेतला होता.तसेच  आलोक नाथ ही खूप मोठी व्यक्ती असून त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपांवर कोणीच विश्वास ठेवणार नाही असे म्हणत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली नाही. त्यामुळे तक्रार दाखल न करण्यासाठी आलोक नाथ यांनी विनता नंदां यांच्यावर  कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला होता याचे पुरावे नसल्याचे कोर्टाने नमूद केले.
शनिवारी आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. विनता नंदा यांच्या घरी जाऊ नये, या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला धमकावू अथवा लाच देऊ नये या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. विनता नंदा यांनी केलेले आरोप खोटे असून त्यात काही तथ्य नसल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदा यांच्याविरोधात  न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला होता.