‘कोरोना’च्या लशीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने (bjp) जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात लशीवरून पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला. विरोधी पक्षांसह अनेक राज्य सरकारांनी सरकारच्या या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला घेराव घातला. कोरोना (coronavirus) लशीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी (union minister pratap sarangi) यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले की, बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार. ओडिशाच्या बालासोरमध्ये केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी म्हणाले की याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरु आहे. साधरण एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचा खर्च साधारण 500 रुपये आहे. बालासोरमध्ये पोट निवडणूक होणार असून प्रताप सारंगी तेथे प्रचारासाठी गेले होते तेव्हा त्यांनी या संदर्भात मोठं विधान केल्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

गेल्या 24 तासात कोरोनाचे 45 हजार 149 नवीन रुग्ण आढळले असून आता कोरोना ग्रस्तांचा आकडा 79 लाख 9 हजार 960 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 480 लोकांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 53 हजार 717 रुग्णांवर देशात कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर 59 हजार 105 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जवळपास 14 हजार रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.