मंदिर उघडून संक्रमण वाढू लागल्यास पुन्हा दोष सरकारला द्याल : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्रातील मंदिरं उघडली पाहिजेत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. जर खबरदारी घेऊन महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का उघडली जात नाहीत ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांच्या प्रश्नाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार. त्यामुळे मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी संयम बाळगा असे आवाहन राऊत यांनी केले.

धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या संदर्भात एक निमयमावली ठरवावी लागले, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करत दोन दिवस द्या असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील महंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

महाराष्ट्रातील मंदिरं हे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद आहेत. म्हणजेच मार्च महिन्यापासून ही मंदिरं बंद आहेत. कोणतीही गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळुहळू अनलॉकच्या दिशेने आपण जात आहोत, असं सगळं असताना मंदिर उघडण्यास काय हरकत आहे ? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मग मंदिरं का उघडण्यात येत नाहीत ? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारलेत.