नीरव मोदीवरून ममताचा भाजपवर पलटवार

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये काल (बुधवारी) अटक झाली. यावरुन मोदी सरकार श्रेय घेत असताना विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही असा दावा केला असतानाच लंडनच्या पत्रकारामुळे नीरव मोदीला पकडण्यात यश आले असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींमुळे नीरव मोदी पकडला गेला नाही असेही बॅनर्जी म्हणाल्या.

नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘नीरव मोदीला अटक करणे हा भाजपचा डाव आहे. नीरव मोदीला अटक करण्याचे यश भाजप सरकारचे नसून लंडनच्या टेलिग्राफच्या पत्रकाराचे आहे, ज्यांनी नीरव मोदीचा खुलासा केला. ही एक गॉट एप मॅच आहे.’

 

निवडणुकीनंतर भाजपा नीरव मोदीला परत पाठवेल –

भाजपनेच नीरव मोदीला पळून जाण्यास मदत केली होती, तेच त्याला आता भारतात आणत आहेत. निवडणुकीसाठी नीरव मोदीला ते भारतात घेऊन येत आहेत. निवडणुकीनंतर ते (भाजप) त्याला पुन्हा पाठवतील, असा आरोप काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केला होता.

बँक खाते उघडतानाच नीरव मोदीला अटक –

नीरव मोदी लंडनमधील मेट्रो बँकेत आपले खाते उघडण्यासाठी गेला असताना बँकेच्या एका अधिकाऱ्याने सतर्कता दाखवत निरव मोदीला पकडण्यास मदत केली. बँक क्लर्कने निरव मोदीला ओळखले आणि स्कॉटलंड यार्डला माहिती दिली. काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि निरव मोदीला अटक केली. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळून लावण्यात आला. या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणाही आता निरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी कामाला लागल्या आहेत.