गुन्हेगारी टोळीतील ९ सराईत जिल्ह्यातून तडीपार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांच्या टोळीतील ९ जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज तडीपारीचे आदेश काढले आहेत.

परमेश्वर ऊर्फ बाळासाहेब नारायण जाधव, जिवन मोहन अंधारे, युवराज माणीक चव्हाम, शेख मंजुर शेख यासीन, शेख एजाज शेख इसाक, दगडू बापु शेरेकर, नागनाथ गोविंद लामतुरे (सर्व रा. घाटनांदुर, ता. अंबाजोगाई), अविनाश कल्याण धुरंदरे (रा. मादळमोही), लहु सुभाष हातागळे (रा. काळा हनुमानठाणा पेठ) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

जिल्ह्यामध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्या तीन टोळ्यातील गुन्हेगारांवर तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. या टोळ्यांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली होती. सध्या लोकसभेच्या निवडणुका असून निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्हे असल्याने त्यांना बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.