जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच झाडावर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील उंच झाडावर चढून एका तेवीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौटूंबिक वादात न्याय मिळत नसल्याने तसेच केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा कारणावरुन महिलेने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने धाव घेत नागरिकांच्या मदतीने समजूत काढून तिला झाडावरुन खाली सुखरुप उतरवले.

प्रकरण काय ?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वीरवडे येथील रहिवाशी असलेल्या अश्विनी हिचा २०१७ साली पंकज पाटील यासोबत विवाह झाला होता. पती पंकज पाटील हा पुण्यात युरेका फोर्ब्स मध्ये कामाला असून, त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. पण लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये आर्थिक देवाण घेवाणी वरुन वाद झाला. त्यानंतर सासरच्या मंडळीने अश्विनी हिला घराबाहेर काढले, आणि दीड वर्षाच्या मुलीला आपल्या कडे ठेऊन घेतले. मुलगी ताब्यात मिळावी म्हणून त्यांचे हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, न्यायालयाने तीन वेळा नोटीस पाठवून सुद्धा सासरच्या मंडळीने मुलीला ताब्यात दिले नाही. तसेच पोलिसात तक्रार केल्यानंतर देखील पोलीस सासरच्या मंडळींवर कारवाई करत नसल्याचे पाहून तिने हे पाऊल उचलले.

पोलिसांना दया येईना…

गुरुवारी ( दि. ३० जुलै) कोर्टाची तारीख असल्याने सासरची मंडळी जळगावमध्ये आली होती. त्यावेळी त्यांनी मुलीला सोबत आणले नाही. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. म्हणून तक्रार करण्यासाठी अश्विनी पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी कार्यालयात गेली होती. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. अंगावर दूध पिणाऱ्या मुलीचा चेहराही आपल्याला दिसू दिला जात नाही..म्हणून तिने १८ मे रोजी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तरी, पोलिसांनी या प्रकरणी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे तिने पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर असलेल्या झाडावर चढली. झाडावर चढून तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजारी असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ धाव घेत, तिला खाली उतरण्याची विनंती केली.

शेवटी बराच वेळ तिला विनंती केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांची मदत घेत तिला खाली उतरवले. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर तिला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. तिची विचारपूस करण्यात आली. तेव्हा सासरच्या मंडळींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी तिच्या आई वडिलांनी केली. आमच्या मुलीला आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर १५ ऑगस्ट दरम्यान पालकमंत्र्यांच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.