पंढरपूरमध्ये 13 ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू,अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह आसपासच्या गावामध्ये 6 ऑगस्टच्या मध्य रात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्य रात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून नागरिकांनी जिल्हा  प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या हितासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा आणि दूध वितरण सुरु राहणार आहे. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. तसेच घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा.

सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करा. हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा. कोरडा खोकला, ताप, थंडी किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. जर कोणती अडचण आली तर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.