सायबर चोरट्यांचा 40 लाखांवर डल्ला, न्यायासाठी निवृत्त अधिकार्‍यानं लिहले थेट PM ला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर गुन्हेगारांनी बिहारमधील एका निवृत्त अधिकाऱ्यांच्या खात्यातील तब्बल 40 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करन घेत आरोपीना अटक केली आहे. मात्र पीडित व्यक्तीला यातील एक रुपयाही परत मिळाला नसल्याने ते न्याय मागत आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी न्यायासाठी पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश चंद्र अखौरी असे निवृत्त अधिका-याचे नाव असून ते बिहारमधील सासाराम येथे राहतात. नाल्कोमध्ये एचआरडी पदावर ते कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर जमवलेले पैसे, त्यांनी आपल्या पुढील आयुष्यासाठी साठवून ठेवले होते. आपल्या नोकरी दरम्यान पाटणामध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. निवृत्तीनंतर त्यांनी तो फ्लॅट विकून, आलेले पैसे बँकेत जमा केले होते. त्या जमा केलेल्या पैशांवर त्यांना व्याज मिळत होते. मात्र सायबर क्राईम आरोपींनी त्यांच्या खात्यातून तब्बल 40 लाखांची चोरी केली आहे. आरोपींनी चोरी केलेल्या पैशातून बनारसमधील एका सोन्याच्या दुकानातून ऑनलाईन पेमेंटद्वारे सोन्याची खरेदी केली. पोलिसांनी या प्रकरणी चार सायबर आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी पीडित व्यक्तीच्या जवळचेच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जण त्यांचे भाडेकरू होते. निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मुली परदेशात राहतात. सासाराम येथे ते एकटेच राहतात. अशात या आरोपींची त्यांच्यावर नजर असून त्यांना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनेही जप्त केले आहे. मात्र त्यांना अद्यापही त्यांचे पैसे परत मिळाले नाही. अखेर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयात पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पीएमओकडून त्यांना प्रतिक्रिया आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बँककडून आपल्याला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.