निवडणुकीच्या वादावरून हल्लेखोरांनी महिला सरपंचासह पतीवर तलवारीने केला हल्ला

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीची जानेवारी मध्ये झालेली निवडणुकीचा राग धरत तेथील एका महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. या झालेल्या हल्ल्यामध्ये महिला सरपंच किरकोळ जखमी झाली आहे. तर पती गंभीर जखमी आहे. यांच्यावर अल राजी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच निलम महेश पाटील या आपले पती महेश सखाराम पाटील यांच्यासोबत कामानिमित्त त्यांच्या कारमधून ठाणे येथे जात होत्या. गावच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने महेश पाटील यांनी आपली कार वडपा गोदामातील पर्यायी रस्त्यावरून टाकली असता या रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमी परिसरात असणाऱ्या अज्ञातांनी कार अडवून हल्ला केला. सरपंचांच्या कारच्या काचा फोडून महिला सरपंच निलम पाटील यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पती महेश पाटील यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी महेश पाटील यांच्यावर तलवार आणि अन्य शस्त्रांनी हल्ला केला. जखमी सरपंच नीलम पाटील यांनी ग्रामपंचायत चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून अजित पाटील, नितेश पाटील, उमेश पाटील, शशी पाटील (सर्व रा .खांडपे) आणि त्यांच्या इतर ३ ते ४ साथीदारांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.