‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ हे केजरीवालांनी दाखवून दिलं : CM उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अरविंद केजरीवालच होणार हे आता निश्चित झाले आहे. भाजपने दिल्ली विधानसभेत संपूर्ण ताकद लावून देखील भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. देशभरातून इतर पक्षांकडून देखील केजरीवाल आणि आपचे अभिनंदन केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं असून केजरीवाल यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली असं म्हटलं आहे.

काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे
तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याची अप्रत्यक्ष टीका देखील ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

प्रचारादरम्यान केजरीवालांची दहशतवाद्यांशी तुलना करून भाजपने मूळ मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही त्यांना केजरीवालांचा पराभव करता आला नाही. दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवरचा विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले.

दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.