दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू, नाल्यात आढळतायत मृतदेह

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली हिंसाचाराच्या एक आठवड्यानंतर भयंकर वास्तव समोर येत आहे. हिंसाचार घडलेल्या भागातील नाल्यांमधून आता मृतदेह सापडत आहेत. मागील दोन दिवसात या नाल्यांमधून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

सोमवारी सकाळी गोकुळपुरी नाल्यातून एक आणखी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यापूर्वी रविवारी याच भागातील नाल्यात 3 मृतदेह सापडले होते, जे पोलिसांनी ताब्यात घेतले.

नार्थ ईस्ट दिल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी 334 एफआयआर दाखल केल्या आहेत. या प्रकरणी 33 लोकांना अटक करण्यात आली आहे, तर 44 केस आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल केल्या आहेत. हिंसाचारात मरणार्‍यांची संख्या आता 46 झाली आहे.

रविवारी गोकुळपुरीच्या दोन नाल्यांमधून 3 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. परंतु, सध्या तरी हे मृतदेह दिल्ली हिंसाचारातील आहेत किंवा नाही यास दुजोरा मिळालेला नाही.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत नाल्यांमधून अनेक मृतदेह सापडले आहेत. यामध्ये आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या मृतदेहाचाही समावेश होता.