रावसाहेब दानवे यांचा रावेर मतदारसंघाचा दौरा भुसावळ येथे झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला होता. यावरूनच जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दानवेंना हाच प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर संतापले. खडसेंवरील कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. सर्व आरोप बेछूट आहेत, असे दानवे म्हणाले आणि स्वत:च्याच वक्तव्यात फसले. खडसे यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत ते आरोप बेछूट आहेत मग त्यांचे पुनर्वसन कधी करणार, असे पत्रकारांनी विचारले असता, काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यांचा निर्णय लागल्यानंतर बघू, असे म्हणत दानवे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
मात्र न्यायालय आरोपांबाबत निर्णय देईलच, परंतु पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे, असे विचारले असता आम्हाला आमचा पक्ष चालवू द्या, असे म्हणत दानवे पत्रकारांवरच संतापले. शिवसेनेबाबत विचारले असता, दानवे म्हणाले, मतांचे विभाजन टाळण्यासाठी सेनेसह समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, पक्ष म्हणून सेनेची भूमिका वेगळी असल्याने तसेच त्यांचा पक्ष वाढण्यासाठी ते भाजपवर टीका करतात. मात्र सरकार म्हणून त्यांच्यासोबत आमचे मतभेद नाहीत. राममंदिराबाबत उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत, याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.