PM मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री करतात, तर बिघडलं कुठं ? अजित पवारांचा टोला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचा कारभार चालवला तर, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टाकी का करावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी लगावला. शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर ते आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, हजारो कोटी रुपये खर्च करुन जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. कॅगनेच या योजनेबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच कॅगद्वारेच याची चौकशी होत आहे. त्यामुळे कुणाची आकसापोटी चौकशी करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोना बाधित रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. तसेच बरे होऊन जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पुरेसा औषधसाठा देखील उपलब्ध असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.