आषाढ वारीसंदर्भात आज निर्णय होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचे संकट गडद होत चालले असून यंदा आषाढी यात्रा होणार का नाही असा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्यासोबत आज दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक होणार आहे.

राज्यातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.ा यात्रेला सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर 150 पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या रेड झोनमधून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रिंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून म्हणजेच रेड झोनमधून जात आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याबाबत नेमका निर्णय काय घ्यायचा यावर आज चर्चा होणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हाही कोरोनाच्या रेड झोनमध्ये असून जवळपास 330 रुग्ण येथे आहेत. अशावेळी आषाढी यात्रेला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या फैलावाची भीती सध्या पंढरपूरकर नागरिक आणि प्रशासनाला भेडसावत आहे. आता परंपरा जपण्यासाठी राज्याला वेठीला धरणे योग्य नसल्याची भूमिका वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी मांडत आहेत. त्यामुळे आज निर्णय घ्यायचा असल्याने आषाढीचे भवितव्य या बैठकीवर अवलंबून आहे.