‘2 खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा झाला, हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ’ : PM नरेंद्र मोदी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील विविध भागात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा झाला आहे. त्याग, तपस्या आणि बलिदान या तीन तत्त्वांवर भाजपा पक्ष उभा आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज भाजपाचा 40 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हा संवाद साधला.

केंद्र सरकारने कोरोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. कोरोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत, ही बाबही महत्त्वाची आहे कोरोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचे धैर्य पाहण्यास मिळाले आहे. असंख्य दिव्यांनी कोरोनाचा अंधार दूर केला असेही त्यांनी स्पष्ट केले.