‘ठाकरे सरकार’च्या मंत्रिमंडळाची ‘ही’ 13 खास वैशिष्ट्ये, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 34व्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी आज विधीमंडळ परिसरात पार पडला. एकूण 36 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 36 पैकी 26 जणांनी कॅबिनेट तर 10 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाची 13 वैशिष्ट्ये

1. एकाच घरात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य़भार पहात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

2. मंत्रिमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख या दोघांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

3. पहिल्यांदा आमदार अन् थेट मंत्री
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे हे तिघेजण पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तिघांनाही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाले आहे.

4. मंत्रिमंडळात केवळ तीन महिला आमदार, सेनेकडून एकही नाही
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तीन महिला आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून यामध्ये शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराने शपथ घेतली नाही. आज शपथ घेतलेल्यांमध्ये काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

5. दोन नेत्यांना युतीच्या सरकारमध्ये (2014) आणि महाविकास आघाडीत मंत्रीपद
2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते. या सरकारमध्ये असलेल्या दोन मंत्र्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी 2014 च्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

6. 40 दिवसांत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ
राज्यात सरकार स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची बोलणी सुरु असताना रात्रीतून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला. 40 दिवसानंतर पुन्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

7. सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री असलेले मंत्रीमंडळ
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 28 नोव्हेबरला महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेबंर रोजी सात मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. दरम्यान 17 दिवस हे महाविकास आघाडीचे सात मंत्री हे बिनखात्याचे मंत्री होते.

8. 32 दिवस लांबलेले मंत्रिमंडळ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सहा नेत्यांनी 28 नोव्हेंबरला मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल एक महिना दोन दिवसांनी आज (दि. 30) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

9. 36 पैकी 13 जिल्ह्यांना एकही मंत्रीपद नाही
आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 13 जिल्ह्यांना एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. यामध्ये सोलापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, धुळे, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

10. या जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात 13 जिल्ह्यांना मंत्रीपद देण्यात आली नाहीत तर मुंबईतल्या 6 नेत्यांना, कोल्हापूरच्या 3, पुणे 3 आणि अहमदनगरच्या 3 आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

11. उस्मानाबादचे 3 जावई मंत्रिमंडळात
मंत्रिमंडळ विस्तारात उस्मानाबादला स्थान मिळाले नसले तरी उस्मानाबादचे तीन जावई मंत्री झाले आहेत. उस्मानाबाद मधील तेर हे गाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे माहेर आहे. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे हे उस्मानाबादच्या उपळा या गावचे जावई आहेत. तर प्राजक्त तनपुरे यांची ढोकी हे गाव सासरवाडी आहे.

12. यापूर्वी मंत्रीपद भूषणवाऱ्यांना पुन्हा मंत्रीपद
शिवसेना – एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे, अब्दुल सत्तार
काँग्रेस – बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नितीन राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड

13. एकाच मंत्रिमंडळात मामा भाचे
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे दोघे मामा-भाचे आहेत. या दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/