फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणे बंद करावे : मंत्री नितीन राऊत

पोलिसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ पाहणं बंद करावं असा टोला काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून संकटाशी एकत्रितपणे लढा देण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांच्या भेटी घेत आहेत. महाराष्ट्रातले सरकार पाडून सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्रा त्यांचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

करोना युद्धात सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मात्र भाजपा कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही अशीही टीका नितीन राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोरोनाचे युद्ध नक्की जिंकेल असेही राऊत यांनी म्हटले आहे. सध्याची वेळ कोणतेही राजकारण करण्याची नाही. मात्र भाजपाला राजकारण करायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातले सरकार पाडायचे आहे. मात्र त्यांच्या मनसुब्यांमध्ये कधीही यश येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.