‘त्या’ आरोपावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘ओपन चॅलेंज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता समीकरण जुळत नसल्याने आणि शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्यामुळे राजीनामा दिला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करणे टाळले. तसेच भाजप सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण करत आहे असे आरोप अनेकांनी केले, मात्र आम्ही फोडाफोडीचे कोणतेही राजकारण केले नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आरोप करणाऱ्या आमदारांनी तसे पुरावे द्यावेत असे देखील फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

जनतेचे आभार व्यक्त करत शिवसेनेने चर्चेला तयारी न दाखवल्यामुळे आम्हाला यावेळी सत्ता स्थापन करता न आल्याचे स्पष्ट मत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केले. पाच वर्षात झालेला विकास खूप महत्वाचा आहे. लढलेल्या जागांपैकी ७० % जागा यावेळी जनतेने आम्हाला दिल्या आणि पुन्हा आम्हाला निवडून दिलं होत. मात्र बहुमत दिल नाही तरीही चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न केले.

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला नव्हता
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या समोर कधीही अडीच वर्षांबाबतच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नव्हता. कदाचित अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात असा काही निर्णय झाला होता का ? यासाठी मी गृहमंत्री अमित शहा यांना विचारले असता त्यांनी याबाबतचा कोणताही शब्द दिला नसल्याचे स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत त्यामुळे आम्ही युतीमध्ये असताना कोणत्याही प्रकारचे वक्तव्य शिवसेनेवर केलेले नाही मात्र गेल्या काही कार्यकाळामध्ये शिवसेनेकडून अनेकदा भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. निकाल लागल्यापासून शिवसेनेला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी अधिक जवळची का वाटू लागली असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अनेकदा आम्ही शिवसेनेशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com