अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं हिंदूत्वाचं खरं ‘रक्त’ जागं होईल, फडणवीसांचा CM ठाकरेंना ‘टोला’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. यावरून आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं म्हणजे तुमच खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिला तो विचार शिवसेना विसरली असल्याचे फडणवीस म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. या अधिवेशनामध्ये आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसात कशा प्रकारे मुर्ख बनवलं यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत सडकून टीका केली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेवर निशाणा साधताना म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात 2014 पासून महाविकास आघाडीची चर्चा सुरु होती असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवारांसोबत संपर्कात होतो हे संजय राऊत यांनी कबूल केले आहे. त्यामुळे विश्वासघात कुणी केला असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला. तर भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ते इथपर्यंत पोहचले असल्याचा टोला त्यांनी लगावला.