‘घाईघाईत’ शपथविधी उरकण्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ‘ते’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पहाटे उठवलेली राष्ट्रपती राजवट आणि सकाळीच उरकलेला शपथविधी यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. इतक्या घाईघाईत शपथविधी उरकायची गरज काय होती, असा प्रश्न त्यावेळी विरोधकांनी विचारला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याने घाईघाईत शपथविधी उरकल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेनं आधीपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र, तरीही आम्ही महिनाभर शांत होतो. त्यानंतर अजित पवार आमच्याकडे आले. तीन पक्षांचे सरकार चालवणं कठीण असल्याचे राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांचं मत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थिर सरकारसाठी पक्षानं भाजपसोबत जावं, असा मतप्रवाह असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रदेखील दिलं. अजित पवारांनी दिलेलं पत्र राष्ट्रपतींकडे गेल्यावरच राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली, अशा शब्दात फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर मी आणि अजित पवारांनी तात्काळ शपथ घेतली. कारण राष्ट्रपती राजवट हटवल्यावर राज्यपालांचे अधिकार संपतात आणि त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री नसतो. राज्यात सरकारच नसल्यानं पोकळी निर्माण होते. त्यामुळेच आम्ही सकाळीच शपथविधी उरकला, असे फडणवीसांनी सांगितले. हा आमचा गनिमी कावा होता, कारण सर्वांनी आम्हाला बाजूला टकलं होतं. कदाचित आमचा गनिमी कावा फसला असेल. आम्ही उचलेल पाऊल कदाचित योग्य असेल किंवा नसेल. यावर चर्चा होऊ शकते, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Visit : Policenama.com