‘शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून…’ फडणवीसांचे CM ठाकरेंना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्याची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहले आहे..
दि.30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथील आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारं, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधानं केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन अंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशा प्रकारची ही गंभीर विधाने आहेत, असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

पत्रात त्यांनी शरजील उस्मानी नेमकं काय बोलला आहे याचा उल्लेख करताना म्हटले आहे की, या भाषणातील शब्दश: वाक्ये अशी आहेत, आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान मे हिंदू समाज बरी तरीके से सड चुका है | ये जो लोग लिचिंग करते है, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे | क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते- बैठते है, फिल्मे देखते है | अगले दिन फिर किसीको पकडते है, फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है | अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर मे पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…

एक युवक राज्यात येतो, छाती ठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढवणारा आहे आणि सर्वांच्या मना शरमेने खाली घालायला लावणारा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस पुढे म्हणतात, मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, या संदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल.

पत्राच्या शेवटी फडणवीस यांनी लिहिले आहे की, खरं तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झालं, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणं, किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानातून दिसून येतं. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करुन वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय. या प्रकरणात कठोरातील कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.